Article 4 in Maharashtra Times by Dr Snehal Sukhatankar

         निसर्गाची किमया अगाध आहे. निर्सगाच्या सृजनशीलतेचा एक सुंदर नमुना म्हणजेच "पुनरुत्पादन". आता बाकीच्या सगळ्या प्राणिमात्रांसाठी प्रजनन  हि एक नैसर्गिक गोष्ट आहे. प्रजातीच्या अस्तित्वासाठी नर -मादीचा संगम यातून नव्या जिवाची उत्पत्ती होते. पण मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे ज्याच्यासाठी मात्र हा केवळ नैसर्गिक भाग नसून यामध्ये  बौद्धिक, भावनिक आणि मनोवैज्ञानिक पैलू हि परिणाम करत असतात.

  समुपदेशनाच्या अनुषंगाने गीता काकू एकदा भेटल्या. खूप त्रासलेल्या आणि वैतागलेल्या दिसत होत्या. कारण त्यांची मुलगी नेहा हिच्या घटस्फोटाची याचिका कोर्टात दाखल झाली होती. मुख्य म्हणजे गीता काकूंना आपल्या जावयाची  बाजू पटत होती. नेहाला लग्नानंतर मुलं अजिबात नको होते आणि तिने हि अट आपल्या आईवडिलांनाही लग्नाआधीच सांगितली होती . पण एकदाका  लग्न झाले कि सगळं काही व्यवस्थित होईल या विचाराखातीर आईवडिलांनीही तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून तिची हि अट होणाऱ्या नवऱ्याला कधी सांगूच दिली नाही. पण लग्नाच्या ३-४ वर्षानंतरही नेहा बाळाचा विचार करायला तयार होईना म्हंटल्यावर मात्र तिच्या नवऱ्याने तिला खडसावून विचारले आणि अर्थातच तिचे "मला मुलं अजिबात नकोय "हे विचारच त्याच्या दुराव्यास कारणीभूत ठरले.

        गीता काकू म्हणाल्या, "आमच्यावेळी लग्न झालं कि पुढे निसर्ग नियमानुसार मुलं होणार , हे निश्चित होतं . यामध्ये नाही आम्ही कधी कुटुंब नियोजन केले आणि नाही  कधी यावर  इतक्या खोलात जाऊन विचार केला. पण आजचा जमानाचं विचित्र आहे पहा”, गीता काकूंबद्दल मला सहानुभूती वाटत असली तरीही नेहाची हि अशी मानसिकता का आणि कशामुळे झाली ? हे प्रश्न तर राहतातच. याच्या मुळाशी जाण्यासाठी मी गीता काकूंना काही प्रश्न विचारले. जसं कि नेहाचे बालपण, काही चांगल्या - कटू आठवणी, तुम्हा आई - वडिलांबरोबर असणारा तिचा  संवाद, तुमचं नवरा - बायकोच आपसी नातं वैगेरे वैगेरे. आणि सांगायला नको, गीता काकूंची उत्तरेच नेहाच्या या मानसिकतेची पुष्टीकरणे देत होता.

          त्याच काय झालं होतं, नेहाच  बालपण  बऱ्यापैकी पाळण्याघरात  गेले  कारण आई - वडील दोघेही नोकरीसाठी जायचे आणि संध्याकाळी आल्या वर थकलेल्या आई-बाबांकडे तिला देण्यासाठी पुरेसा वेळ नसायचा. नेहाला त्यांना खूप काही सांगायचं असायचं, व्यक्त व्हायचं असायचं, त्यांच्या सोबत खेळायचं असायचं पण दुर्दैवाने तिला आई - वडिलांनी आणून  दिलेल्या महागड्या निर्जीव खेळणीवरच भागवाव लागायचं. बऱ्याचवेळा आई - वडिलांचे एकमेकात खटके उडायचे, जोरात भांडण व्हायची, केवळ मुलगी आहे म्हणून आपण एकत्र राहतोय नाही तर केव्हाच तुला सोडलं असतं अशी वाक्य त्या इवल्या जीवावर पुन्हा पुन्हा आघात करायची. कधी कधी तर आई - वडिलांची भांडणे इतकी विकोपाला जायची कि एकमेकांवर हात हि उगारले जायचे आणि यासर्वांमुळे घाबरलेली नेहा खोलीत स्वतःला डांबून घेऊन बसायची.जसजशी ती  मोठी होऊ लागली  तसतशी बोलकी आणि लाघवी असणारी नेहा एकलकोंडी आणि अलिप्त होऊ लागली. एका वयानंतर आई - वडिलांच्या नात्यात सुधार आला खरा पण नेहाच्या मनावर मात्र नात्यांबद्दलचा तिढा कायचाच राहिला.

     आता तुम्ही मला सांगा नेहाच्या या मानसिकतेला खऱ्या अर्थाने कोण जबाबदार आहे ???

             लहान  मुलांसाठी त्याचे आई - वडील हेच प्रथम मित्र - मैत्रीण आणि प्रथम आदर्श असतात. मग जर गीता काकूंसारखे आदर्श मुलांनी त्यांच्या लहानपणी अनुभवले तर  परिस्थिती हीच होणार ना? त्यामुळे लग्नानंतर पालकत्वाच्या दृष्टीने आई - वडिलांनी स्वतःला मानसिक आणि भावनिक पातळीवर तयार करणे अत्यंत महत्वाचे असते. कोणत्या गोष्टी मुलांसमोर आल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही याची आई - वडिलांनी काळजी घेतली पाहिजे. 

        काही जोडप्याना आर्थिक समस्या इतक्या भयंकर असतात कि त्यात एका नव्या जीवाला जन्म देणे , त्याचे योग्य पालनपोषण करणे शक्य नसते आणि पर्यायाने आपल्याला मुलं नकोच हा निर्णय मनावर दगड ठेवून घेतला जातो. पण आज असेही काही तरुण - तरुणी आहेत ज्यांना आपलं करियर , आपली स्वतंत्रता मुलाबाळांच्यापाठी गमवायची नाहीये.  लग्नानंतर बाळाचे व्यवस्थित पालकत्व आपण निभावू शकू कि नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका असते कारण नवरा - बायको दोघानांही आपापल्या करियरमध्ये अजिबात तडजोड करायची नसते. काही  तरुण - तरुणी इतके आत्मकेंद्रित झाले आहेत कि त्यांना लग्नानंतर आपले पटेल कि नाही याचीही शंका लग्न करतानाच भेडसावत असते  आणि त्यामुळेच कदाचित ते "आपल्याला मुलंच नको" हा निर्णय घेतात. कारण भविष्यात एकमेकात जमले तर जमले नाही तर दोघेही आर्थिक दृष्ट्या सबळ असल्याने "एकटा जीव सदाशिव " हि संकल्पना तर आहेच. पण सगळ्या गोष्टीना अपवाद हे असतातच. मुलं नको नको म्हणणारे अनेकजण लग्नाच्या काही वर्षानंतर रितेपण घालवण्यासाठी पाळीव प्राणी जसे कि कुत्रा , मांजर ठेवतात आणि मग त्यांची देखभाल करण्यात धन्यता मानतात. पण मी पाहिलंय अशा लोकांच्या आयुष्यात एका विशिष्ट वयानंतर मोकळेपण असतेच.

             आता मुलं हवं कि नको हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो. आणि त्यापाठी येणारे जे काही सुख - दुःख आहे ते त्यांनाच पेलायचे असते पण आपल्या समाजानेही अशा तरुण - तरुणींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. जर एखाद्याला लग्नानंतर मुलं नकोच आहे आणि हि गोष्ट ती व्यक्ती लग्नाआधीच मांडते यातून त्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा समोर येतो. कारण लग्नानंतर एका जोडीदाराला मुलं हवं आणि एकाला नको अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्या सहजीवनाचे पार बारा वाजायला वेळ लागत नाही. त्याउलट लग्नाआधीच अपेक्षा स्पष्ट असल्या तर  सहजीवन जास्त आनंदी होऊ शकते.

आजची एकूणच परिस्थिती पाहता वंध्यत्वाचे प्रमाण आधीच्या तुलनेत वाढले आहे. यामुळे अनेक जोडप्याना नैसर्गिक किंवा कृत्रिमरीत्या मुलं होणं शक्य नसत. अशावेळी पर्याय निवडला जातो तो "मुलं दत्तक घेण्याचा".  जेणेकरून जोडप्यालाही आई-वडील होण्याचा आनंद उपभोगता येतो आणि एका निरागस जीवालाही एक चांगले , प्रतिष्ठित आयुष्य मिळते.

    एखाद मुलं दत्तक घेणे हि आपल्या समाजातील खूप जुनी पण तितकीशी लोकप्रिय नसलेली संकल्पना. आधीच्या काळात जोडप्याला जर काही कारणास्तव मुलं होणारच नसेल जस कि नवरा किंवा बायको मध्ये शारीरिक पातळीवर काही व्याधी किंवा कमतरता तर घराण्याला वारस हवा या विचाराने एखादे अनाथ किंवा गरीब कुटुंबातील किंवा नात्यातील बाळाला दत्तक घेतले जायचे. पण बाळ आले तरीहि त्या बाळाला कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारणे घरातील अनेकांना जड जायचे. खूप मोठा काळ लागायचा त्या बाळाला आपलंसं मानायला. आणि म्हणूनच या संकल्पनेकडे तितक्याशा सकारात्मकतेने पाहिले जायचे नाही.

बदलत्या काळानुसार दत्तक प्रक्रियेकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होतोय. एकतर जोडपी स्वतःच मुलं होतच नाही म्हणून मुलं दत्तक घेतात पण  मी अशीही काही उदाहरणे पाहिली आहेत जिथे त्या दत्तक घेतलेल्या बाळाचा लळा असा काही लागतो हि आई - वडिलांच्या शरीरातील आवश्यक संप्रेरके सक्रिय होतात आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी तुम्हाला मुलं होणार नाही असं सांगितलं असतानाही त्यांना स्वतःच मुलं होतं . पण स्वतःचे मुलं झाल्यावर , दत्तक घेतलेल्या बाळाला अंतर न देता, दोन्ही मुलांमध्ये भेदभाव न करता समानतेने दोघांचेही संगोपन करणे अशावेळी अपेक्षित असते.

      मला असे वाटते आई - वडिलांचे त्यांच्या बाळाबरोबर असलेले नाते हे कोणत्याही अटीतटीशिवाय निव्वळ प्रेमभाव आणि आपलेपणावर आधारित असले पाहिजे. अशावेळी स्वतःचे बाळ असताना दुसऱ्या बाळाला मनापासून आपलं मानणं आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्याचे संगोपन करणं हि एक खूप मोठी आणि वास्तवात एक अवघड गोष्ट आहे. त्यामुळे जी जोडपी हा धाडसी निर्णय शेवट पर्यंत निभावू शकतील त्यांनीच हि जबाबदारी घ्यायला हवी. आपल्याला मुलं हवंय , मुलाला वाढवणे, त्याला  कुरवाळणे, त्याच्यावर भरभरून प्रेम करणे, त्याच्या छोट्या छोट्या खट्याळ वागण्यामागचा आनंद घेणे यात आई- वडिलांना आनंद असतो. आपण आपल्या आनंदासाठी मुलांना जन्म देतो किंवा दत्तक घेतो. या सगळ्यामध्ये आपणच  या मुलासाठी काहीतरी करतोय हि भावना बरी नव्हे .

शेवटी काय आहे जसे आई -वडिलांमुळे बाळाचे अस्तित्व  निर्माण होते  तसेच बाळामुळेच आई- वडीलही नव्याने निर्माण होतात . त्यामुळे सहजीवनची हि सुवर्ण वाटचाल निखळ  प्रेम आणि ममता याचे खऱ्या अर्थाने द्योतक असते.

डॉ . स्नेहल अवधूत सुखटणकर

  22nd February, 2023

Leave a Comment