Dr Snehal Sukhatankar,s article published in Tarun Bharat on 27/Nov/2019 - Marriage Sanskar

विवाह  संस्कार

                   आपण बऱ्याचवेळा संस्कारांच्या गोष्टी करतो ,पण हे संस्कार म्हणजे नक्की काय ? संस्कारांची गरज काय ? यावर आज आपण विचार करू . मूलतः संस्कार म्हणजे काहीतरी चांगलं करणे अशी जनसामान्यात भावना आहे . ज्याने माणूस स्वतःची, कुटुंबाची आणि पर्यायाने समाजच्या प्रगती साधू शकतो . शास्त्राने संस्कारांची परिभाषा  अगदी समर्पकपने अशी केली आहे " माणसाचे अंगी असलेले दोष काढून टाकून त्या जागी गुण निर्माण करणे व एखादे हिनांग असेल तर ते भरून काढणे म्हणजे संस्कार " .

                 उदाहरणार्थ  लाखो वर्षे कोळसा जमिनीत राहून त्याचा हिरा बनतो . पण तो हिरा मौल्यवान बनवण्यासाठी त्यावरची माती , अशुद्धता काढावी लागते , त्याला पैलू पाडावे लागतात तरच त्या हिऱ्याला आपण दागिन्यांच्या स्वरूपात परिधान करू शकतो म्हणजे अगदी मौल्यवान दिसणाऱ्या वस्तूचेही हिनांग काढून त्याला संस्कारित केल्याशिवाय त्याला प्रतिष्ठा मिळत नाही . तसेच सोना , चांदी यांचे संस्कारित केलेले भस्म , त्यांच्या शुद्ध रूपापेक्षा जास्ती गुणकारक असते .  म्हणजे जेव्हा या निर्जीव वस्तू संस्काराने इतक्या मौल्यावनं आणि उपयोगी ठरू शकतात तर आपण माणसे तर या संस्कारानी कुठच्याकुठे तरून जाऊ ! तसे  तर आपल्या शास्त्रात एकूण ४८ संस्कार सांगितलेले आहेत पण त्या सगळ्याचे अनुसरण करणे अवघड म्हणून त्यातून  १६ संस्कार महत्वाचे सांगितलेले आहेत . त्यातीलच एक अति महत्वाचा " विवाह संस्कार " . शास्त्र असे सांगते विवाह संस्काराने ऐहिक च नव्हे तर पारमार्थिक प्रगतीही साधता येते .

               मनुस्मृतीनुसार   एकूण ८ पद्धतीचे विवाह आपल्या हिंदू संस्कृतीत व्हायचे , त्याबद्दल अगदी थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू .

१. ब्रह्म विवाह : या पद्धतीच्या विवाहाला विशेष महत्व दिल गेलय . यात सर्व दृष्टया अनुरूप असणाऱ्या दोन कुटुंबातील वधू - वरांचे लग्न होते .यात वर पक्ष लग्नासाठी वधुपित्याकडे मागणी घालत असे . वरास सालंकृत वधूचे कन्यादान करणे हॆ या विवाहाचे खास वैशिष्ट्य . आपल्याकडे सर्वात जास्ती विवाह ब्रह पद्धतीनेच होतात .

२. दैव विवाह :  या प्रकारच्या लग्नात वधू पक्ष जर वधूला एका ठराविक वयापर्यंत योग्य वर मिळाला नाही तर देवालयातील पुजारींबरोबर तिचे लग्न लावून देत असत .

 ३. आर्ष विवाह : यामध्ये वरपक्षाने वधूपक्षाला गोदान व एक म्हैशींची जोडी भेट म्हणून द्यायची पद्धत होती

 

४. प्रजापत्य विवाह : ब्रह्म विवाह आणि प्रजापत्य विवाह यात बरीचशी साम्यता दिसून येते , फक्त या विवाहात वधूपक्षाने पहिली लग्नासाठी  मागणी घालावी लागे . या पद्धतीत कन्यादान नव्हते . " पाणिग्रहण " नावाची विधी होत असे ज्यात वराला वधुपित्यासमोर पाणी सोडून संकल्प करावा लागे कि , तो आयुष्यभर आपल्या वधूला सांभाळेल , तीच रक्षण करेल , तिला सुखी ठेवेल . आणि पाणीग्रहणा नंतरच विवाह विधीला प्रारंभ होत असे .

५. गंधर्व विवाह : वधू - वरानी स्वतःच्या पसंतीने परस्परांना निश्चित करून विवाह करणे .

६. आसुर विवाह: या प्रकारच्या विवाहामध्ये वधू पक्षाकडून लग्नाला संमती मिळवण्यासाठी वरपक्षाकडून बऱ्याचशा भेटवस्तू दिल्या जातात आणि मग हा विवाह होतो .

७. राक्षस विवाह : या प्रकारच्या विवाहात वधूपक्ष लग्नाच्या विरुद्ध असताना वरपक्षाकडून मुलीला पळवून घेऊन जाऊन त्यांचा विवाह केला जाई .

८. पिशाच्च विवाह : या प्रकारच्या लग्नाला धर्माने मान्यता दिलेली नाही . यामध्ये वधूची विवाहाला संमती नसताना तिच्यावर जादूटोणा प्रयोग करून जबरदस्तीने विवाह केला जाई .

     

              या सर्व विवाहामध्ये ब्रह्म विवाह सर्वश्रेष्ठ विवाह होय . आणि हीच विवाह पद्धती आपल्या समाजात जास्त प्रचलित आहे .

  27th November, 2019

Leave a Comment